भारताचा फिनटेक क्षेत्रातील प्रवास हा वित्तीय सर्वसमावेशकता आणि तंत्रज्ञानातील परिवर्तनाचा प्रमुख चालक ठरला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मुंबईत आयोजित 'ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल २०२६' चे उद्घाटन करताना ते बोलत होते. नवोन्मेष, तरुणांचा सहभाग आणि जोखीम पत्करण्याची वृत्ती यांमुळे विस्तारत असलेली भारताची फिनटेक परिसंस्था देशाला 'विकसित भारत' बनवण्याच्या संकल्पाला अधिक बळ देत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जागतिक पातळीवर सुरू असलेले संघर्ष, व्यापारी तणाव आणि पुरवठा साखळीवरील दबावाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, अशा अनिश्चिततेच्या काळातही भारताने चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत ७.८ टक्के विकासदर नोंदवून आपली ताकद दाखवून दिली आहे. याशिवाय, एका जपानी क्रेडिट रेटिंग एजन्सीने तीन दशकांनंतर भारताचे सार्वभौम मानांकन 'A-' श्रेणीत सुधारणे, हे देशाच्या आर्थिक धोरणांचे आणि स्थैर्याचे मोठे यश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
UPI मुळे देशात डिजिटल क्रांती; जागतिक मानके उभारण्याचे आवाहन
भारताच्या फिनटेक यशाच्या केंद्रस्थानी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, गेल्या २५ ऑगस्ट रोजी UPI च्या प्रवासाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. केवळ ऑगस्ट महिन्यातच UPI द्वारे २४ अब्जांपेक्षा अधिक व्यवहार झाले आहेत. UPI हा केवळ तांत्रिक बदल नसून एक सभ्यताविषयक परिवर्तन आहे, या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वक्तव्याचा त्यांनी दाखला दिला. सध्या ११ देशांमध्ये कार्यरत असलेल्या UPI ला आता जगभरातील देशांतर्गत पेमेंट नेटवर्कशी जोडून आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच परदेशी मानकांवर अवलंबून न राहता भारतीय फिनटेक उद्योगाने स्वतःची जागतिक मानके आणि प्रोटोकॉल विकसित करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
'केवळ पेमेंट्सपुरते मर्यादित न राहता सर्वसमावेशकतेवर भर द्या'
फिनटेक क्षेत्राला केवळ डिजिटल व्यवहारांपुरते मर्यादित न राहता कर्ज, विमा, बचत, गुंतवणूक आणि निवृत्तीवेतन (पेन्शन) उत्पादनांच्या विस्तारावर भर देण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. 'पीएम स्वनिधी' योजनेची मुदत २०३० पर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे लाखो पथविक्रेते औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत व त्यांच्या उत्पन्नात २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याच धर्तीवर डिलिव्हरी पार्टनर्स आणि गिग वर्कर्स यांसारख्या असंघटित कामगारांसाठी विमा आणि पेन्शनच्या सुविधा क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देण्याइतक्याच सुलभ कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भविष्यातील तंत्रज्ञान आणि चार सूत्री अजेंडा
आगामी काळात एजंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटम कॉम्प्युटिंग ही तंत्रज्ञाने आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवतील, असे सांगताना तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी झाला पाहिजे यावर त्यांनी भर दिला. यासाठी पंतप्रधानांनी फिनटेक क्षेत्रासमोर चार सूत्री अजेंडा मांडला. जागतिक दर्जाची सायबरसुरक्षा, डेटा संरक्षणाची नैतिक मानके, नियामक आणि उद्योग यांच्यातील मजबूत सहकार्य, फिनटेक ग्राहक संरक्षण निर्देशांक तयार करणे, असे ते म्हणाले. विश्वास, सुरक्षितता आणि मोठ्या प्रमाणावर सेवा देण्याची क्षमता या तत्त्वांवर पुढे जात भारतीय फिनटेक क्षेत्राने जागतिक संधींचे प्रवेशद्वार बनावे, असे आवाहन करत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
(0)Comments